केंद्र शासनाची महाराष्ट्राला मोठी मदत !!! विश्वास::-२०१ तहसील क्षेत्रात निसर्गाची अवक्रुपा झाल्याने निर्माण झालेल्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्रशासन मदत करेल !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

केंद्र शासनाच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्राला मोठी मदत- मुख्यमंत्री

            केंद्र शासन नेहमीच महाराष्ट्राला विविध योजना आणि प्रकल्पांसाठी मदत करीत असते.यावर्षी निसर्गाची अवकृपा झाल्याने 201 तहसीलमध्ये पाऊस कमी झाला आहे. अशावेळी या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र शासन मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

            उत्पादन मूल्यावर आधारित दीडपट भाव देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. शेतकऱ्यांसाठी स्वयंपूर्णता आणण्यासाठी केंद्र सरकार काम करीत आहे. त्या योजनांची अंमलबजावणी राज्यात चांगल्या प्रकारे व्हावी, असे काम सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सध्याच्या परिस्थितीत  केंद्र शासन मदतीचा हात देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले आहेत. कुकडी आणि निळवंडे धरणाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यात येतील. नगर शहरातील उड्डाणपुला साठीही 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

            ते म्हणाले, गरीबांसाठी काम करण्याची प्रेरणा शिर्डी येथून मिळते. स्वातंत्र्याची 75 वर्षे लवकरच पूर्ण होत आहेत. अशावेळी सर्वांना घरे देण्याची महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाला जाणार आहे. राज्याला दिलेल्या 4 लाख 50 हजार घरांपैकी 2 लाख 50 हजार घरे पूर्ण झाली आहेत. दिवाळीपर्यंत आणखी 50 हजार घरे  पूर्ण होतील. राज्याला आणखी 6 लाख घरकुलांसाठी परवानगी देण्याची विनंती केंद्र शासनाला केली असून मंजूरी मिळाल्यास मोहिम स्तरावर डिसेंबर 2019 पर्यंत घरकूल बांधण्यात येतील, असेही  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            भूमीहिनांना घरे देण्याबरोबरच स्वच्छता आणि आरोग्याच्या बाबतीतही शासन विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती त्यांनी दिली.

            शिर्डी हे शहर धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्याचबरोबर यापुढील काळात ‘नॉलेज हब’ म्हणून हे शहर पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुविधा याठिकाणी निर्माण होत असल्याचे  फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            प्रास्ताविकात पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्याला मिळालेल्या साडेचार लाख घरकुलांपैकी अडीच लाख घरकुले पुर्ण करण्यात आली आहेत. या घरकुलांसाठी 3 हजार 472 कोटी खर्च करण्यात आला आहे. लभार्थ्यांना रोहयो अंतर्गत 90 दिवसाचा रोजगार, सौभाग्य योजनेअंतर्गत वीज कनेक्शन आणि उज्वला योजने अंतर्गत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येते. 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे धोरणा अंतर्गत राज्यातील 10 लाख 51 हजार पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरे  देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

            पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात प्रधानमंत्री आवास योजनेच्या 10 लाभार्थ्यांना घरकूलाच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.

            यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते घरकुल प्रवेशाचा कलश आणि चाव्या इंदुबाई खवळे (रा. नायगाव, जि. अहमदनगर), सूर्यभान बरडे (लोणी, जि.अहमदनगर), अनिता विटकर (खंडाळा, जि. औरंगाबाद), नंदा बोंबले (खंबाळे, जि. नाशिक), शिवराम वाघमारे (बुबळी, जि. नाशिक), रत्ना दुमसे (अभोना, जि. नाशिक), सखुबाई मेंगाळ (ठाकरवाडी, जि. नाशिक), सोनाली कांबळे (जवळगाव, जि. बीड), लंकाबाई जगताप (कानडीखुर्द, जि. बीड), मंदा मोरे (टाकळीहाजी, जि. पुणे) या लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आला.

            तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळा समारोपाचे ध्वजावतरण करण्यात आले. संस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रधानमंत्री मोदी यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यां समवेत श्री साईबाबा समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !