,,,,,,,,,,,,२९ भावंडांचा जीव धोक्यात ?,,,,,,,,,,,,,,,. हॅशटॅग चिपको चळवळ महाराष्ट्रासह पोहचली गोव्यात !! मी बोलू, बघू, ऐकू शकत नसलो तरीही तुमच्यासारख्याच भावना मलाही आहेत !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!





न्यूज
मसाला सर्विसेस नासिक
7387333801
**********************************

माझा आवाज झाली आहे

'हॅशटॅग चिपको' चळवळ !


    मी बोलू ,बघू ,ऐकू शकत नाही. तरीही मला तुमच्या सारख्याच भावना आहेत.मी वर्षानुवर्षे ताठपणे उभा राहून अनेक पावसाळे अनुभवले आहेत. भूमाता माझे लालनपालन करते तर वरुणदेवाच्या आशीर्वादाने मी बहरतो. फुले, फळे देतो. स्वतः कार्बन डायऑक्साईड घेऊन हवेत प्राणवायू सोडतो. अनेक पक्षी माझ्या अंगाखांद्यावर खेळतात, रात्री विसावतात पण तुमच्यासारखी माणसे मात्र माझ्या मुळावर उठतात ! आताच नाशिकमधील माझ्या २९ भावंडांचा जीव धोक्यात आल्याने काही संवेदनशील पर्यावरणप्रेमी त्यांच्या बचावासाठी तातडीने धावून गेले. त्यातून 'हॅशटॅग चिपको' ही चळवळ जन्माला आली. बघता बघता ती राज्यात सर्वत्र पसरली व थेट गोव्यापर्यंत जाऊन पोहोचली. ही चळवळ आता माझे डोळे, कान आणि मुख्य म्हणजे आवाज बनली आहे.त्यामुळेच हा मनमोकळा संवाद...


    उत्तुंग झेप फाउंडेशनचे संस्थापक तसंच सामाजिक कार्यकर्ते रोहन देशपांडे व सहकाऱ्यांनी हॅशटॅग चिपको,नाशिक ही चळवळ तळमळीने उभी केली. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुंदरलाल बहुगुणा यांना ती समर्पित करण्यात आली. अनेकांची भक्कमपणे साथ मिळाल्याने ती अल्पावधीतच राज्यभरात पसरली.आपल्या शेजारच्या गोव्यातही या चळवळीने हातपाय पसरले आहेत. त्यामुळेच सुस्त असणाऱ्या संबंधित यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. हे चळवळीचे निर्विवाद यश असून त्यामुळे झाडांची अमानुषपणे कत्तल करण्यावर नियंत्रण येईल. नाशिकमध्ये विविध ठिकाणचे २९ पुरातन वृक्ष तोडण्याला वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आणि संघर्ष पेटला. या अवैध वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. नाशिकचे विभागीय आयुक्त व मनपा आयुक्त यांची रोहन देशपांडे व अश्विनी भट यांनी भेट घेतली. दोन्हीही अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे चळवळीतील सहभागी कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. दरम्यान सर्वोच्च व मुंबई उच्च न्यायालयाने २००९ व २०१५ मध्ये दिलेल्या स्पष्ट आदेशांचा अवमान वृक्ष प्राधिकरण समितीने न करता या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले. अन्यथा सांकेतिक पद्धतीने जिल्हाभर आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला. माझे एक वर्षाचे मूल्य ९४ हजार ५०० रुपये असते;वयानुसार ते वाढत जाते असेही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. चिपको चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्याकडेही लक्ष वेधले आहे.


    आम्ही झाडे रस्त्यांच्या मध्ये येतो म्हणून अपघात होतात, असा आरोप आमच्यावर केला जातो. पण अपघात आमच्यामुळे नव्हे तर भरधाव वेग, मद्यपान करून बेजबाबदारपणे वाहन चालवणे, निष्काळजीपणा व इतर मानवी हलगर्जीपणामुळे होतात असा अहवाल पोलीस व आर.टी.ओ.ने दिला आहे. अपघातात आमच्या मूक बांधवांचे मात्र हकनाक जीव जातात. कोरोनाच्या संकटात प्राणवायूची आत्यंतिक गरज अधोरेखित झाली. अशा वेळी आमची अशी सर्रास हत्या कशासाठी, असा आमचा रास्त सवाल आहे. रात्रीच्या अंधारात आम्ही दिसत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळते. ते टाळण्यासाठी आमच्या खोडांवर फ्लुरोसेन्ट रंग लावावा, सभोवताली रिफ्लेक्टर्स लावून छोटी बेटे निर्माण करावीत असेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आमचे व माणसांचे प्राण वाचतील. राज्य शासनाने ५० वर्षांवरील वयाच्या झाडांना 'हेरिटेज' दर्जा बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाचे जलतज्ज्ञ राजेश पंडित यांनीही चिपको चळवळीला पाठिंबा दिला. त्यांनी सद्य:स्थितीत केवळ २९ वृक्षांचा हा प्रश्न नसून; राज्यातील हजारो झाडे, निसर्ग व पर्यावरणाशी ही बाब निगडित आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले. 'नीरी' व अन्य विविध संस्थांनी यापूर्वी वेळोवेळी पुनर्रोपित केलेली ८० टक्के झाडे जगली आहेत. त्यामुळे संघर्षाऐवजी संबंधित व्यक्ती, संस्था, संघटना यांच्याशी चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी एका कलाकाराने यमराजाच्या भूमिकेतून प्रभावी प्रबोधन केले. हॅशटॅग चिपको चळवळीने सुजाण नागरिकांना त्यांच्या आसपास कुठेही अवैध वृक्षतोड होत असेल, तर त्या झाडाला प्रेमाने मिठी मारून त्याचा फोटो पाठवावा, असे कळविले असून, त्यालाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निसर्ग बलाढ्य आहे तसाच तो सहनशीलही आहे, परंतु त्याचा अंत पाहू नका हेच आम्हा झाडांचे सांगणे आहे.

                                              -संजय देवधर
                            ( वरिष्ठ पत्रकार,नाशिक )

***********************************
जनहित याचिकेच्या

निकालाचा अवमान नको !


    न्यायालयाचा अवमान केल्याबाबत महापालिका आयुक्त व मुख्य वनसंरक्षक यांना याचिकाकर्ते ऋषिकेश नाझरे व अश्विनी भट यांच्यातर्फे ऍड. तेजस दंडे यांनी नोटीस बजावली. त्यात महापालिकेने पूर्वी वाचलेल्या ज्या २९ वृक्षतोडी संदर्भात प्रक्रिया सुरु केली ती जनहित याचिका क्र.४१-२००६ च्या आदेशाचा भंग करणारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. 


८ मे २०१५ रोजी दिलेल्या आदेशानुसार वृक्षतोडीला मनाई करण्यात आली होती. त्याविरुद्ध तत्कालीन मनपा आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागण्याचा प्रयत्न केला होता. तो अयशस्वी ठरला. तीच २९ झाडे पाडण्याचा आता पुन्हा घाट घालण्यात आला आहे. त्याविरुद्ध संतापाची लाट पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये उमटली आहे.वास्तविक झाडे वाचवण्यासाठी रस्त्याची दिशा बदलणे हा सोपा मार्ग आहे. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे पर्यावरणमित्र उदय थोरात, जसबीर सिंग यांनी सुचवले आहे. हॅशटॅग चळवळीत संवेदनशील युवकांनी व सुजाण नागरिकांनी सहभागी होण्यासाठी ८००७७६५७७७ या क्रमांकावर रोहन देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा. तसेच uttungzepfoundation@gmail.com या पत्यावरही लिहिता येईल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।