राजकारण करु इच्छिणाऱ्या राजकारण्यांनो अवकातीत रहा ! ..................आणि आज कुणीही उठतं आणि एकमेकांवर गलिच्छ पणे गरळ ओकतात, उदाहरणच द्यायचे झाले तर राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल या संवैधानिक पदांनाही सोडत नाहीत, बुजगावणे, रबर स्टॅम्प, मौनी, ५६ इंची, चायवाला, कोरोना, टरबुज्या, चंपा, तुझी उंची काय ? चाटुगिरी, झेरॉक्स,  ही काय विशेषणे वापरली म्हणजे जनतेने यांना नेता म्हणायचे ?.................. सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

राजकारण करु इच्छिणाऱ्या राजकारण्यांनो अवकातीत रहा !
           "राजकारण करु इच्छिणाऱ्या राजकारण्यांनो अवकातीत रहा" असं म्हणणं सोपं आहे, त्याचे परिणाम किती अंगलट येतील त्यांचे मोजमाप करता येणे शक्य नाही. येथे मुद्दा असा आहे की प्रस्थापित राजकारणी हे प्रगल्भ गटात मोडतात. त्यांना जे राजकीय बाळकडू मिळालेत, धडे मिळालेत, त्यांच्या पाठीमागे "राजकारण" कसे करावे हे सांगणारे, शिकवणारे व नवतरुणांना राजकारणात आणताना ज्या तरुणांची भरती होत असे ते निवडून, पारखून घेतले जात होते, आजचे चित्र खूप विदारक आहे, लोकशाहीचा गळा घोटणारे वाटायला लागले आहे.
         तत्कालीन परिस्थितीत तेव्हाचे नेते काय वागलेत, त्यांनी घेतलेले निर्णय देशासाठी चांगले की मारक ठरले हा विषय नाही मात्र राजकारणात प्रवेश देताना त्यांनी जे निर्णय घेतले ते अपवाद वगळता एक सक्षम नेतृत्व देऊ शकतो असे तरुण वाखाणण्याजोगे होते. अनेक पक्ष, पक्षांचे नेते देशपातळीवरील नवीन नेते घडविण्यासाठी काळजी घेत असत आणि आज त्याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. लुच्चे, लफंगे, भ्रष्टाचारी, घाण, बारीक, जाड, ढेरीवाले, खपाट ही विशेषणे तेव्हाही होती पण वापर करावासा कधी कुणाला वाटले नाही, गालीबचा एखादा मुखडा, रामायण-महाभारतातील पात्राचा दाखला, संतमहात्म्यांची वचने, स्वरचित कविता वापरून विरोधकांना सुनावत होते तेही आत्मविश्वासाने जनतेसमोर मांडले पण कधी यावरून जनतेत राग, असंतोष कधी माजल्याचे ऐकीवात नाही.
      आणि आज कुणीही उठतं आणि एकमेकांवर गलिच्छ पणे गरळ ओकतात, उदाहरणच द्यायचे झाले तर राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल या संवैधानिक पदांनाही सोडत नाहीत, बुजगावणे, रबर स्टॅम्प, मौनी, ५६ इंची, चायवाला, कोरोना, टरबुज्या, चंपा, तुझी उंची काय ? चाटुगिरी, झेरॉक्स,  ही काय विशेषणे वापरली म्हणजे जनतेने यांना नेता म्हणायचे ? जनता सूज्ञ आहे, जनतेला मुर्ख समजणाऱ्यांनी जरा सर्वसामान्यांमध्ये वेशभूषा बदलून जरा फिरावे मग सत्य परिस्थिती समजेल !
         राजकारणात जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यापैकी ९९ टक्के राजकारण्यांच्या तोंडी अशी भाषा सहसा वापरल्याचे दिसत नाही, निवडणुकांच्या काळात एखाद्या वेळी अपवादात्मक कुणी वापरलीच तर त्यावर प्रतिक्रिया येते ती माध्यमांतून, रस्त्यावर नाही, पुतळे जाळून नाही, तरीही हा गोंधळ कसा होतो ? प्रस्थापित वा नवीन राजकारणी असो, यांच्याकडे ५०, १००, ५००, १००० डोकी असतात, तेही कुठल्यातरी अपेक्षेने जवळ असतात हे जगजाहीर आहे, (त्यांनी रहावं की नाही याबाबत आक्षेप नाही) एखाद्या नेत्याबद्दल कुणी अपशब्द वापरला तर पुतळा जाळा, प्रतिमेला जोडे मारा, कधी कधी मारझोड करणे, अन्यथा पोलीसांत गुन्हा नोंदविणे, हे सारे लाखो-कोट्यावधी लोकसंख्येच्या शहरात केले जाते आणि वर सांगितलेल्या दशकीय संख्येने, राजकारणी मोठा समजला जात असल्यास शेकड्यात निदर्शने होतात !  इतकीच मते लागतात का निवडून येण्यासाठी ? जनसामान्यांवर "सायकाॅलाॅजिल"  अटॅक करायचा "फंडा" ही आता निष्प्रभ होऊ लागला आहे, मतदारांना गृहीत धरणे खरोखरच आता घातक आहे, मतदारांच्या हातातील मुठीत जग सामावलेले आहे, अशा फालतू "कमेंट्स" करून यापुढे निवडणूक लढविण्याचा कुणी विचार करीत असेल तर वेळ आणि पैसा बरबाद करु नका, जेथे सर्वसामान्यांच्या पिढ्यानपिढ्यांचे कल्याण होऊ शकते अशा विचाराने प्रेरीत झालेले अभ्यासू नेत्यांनाही जमले नाही किंबहुना त्यांनाही जनतेने राजकारणात प्रवेश करताच बाहेरचा रस्ता दाखवला आहे हे विसरून चालणार नाही.
            राजकारण करु इच्छिणाऱ्या राजकारण्यांनो अवकादीत रहा, कुणी घरच्यांच्या नावाने "फाऊंडेशन", संघटना, क्रिडा मंडळ, थोर नेत्यांच्या नांवाने सामाजिक चळवळ स्थापन करतात. ज्यांना भविष्यात राजकारण करायचे आहे, राजकारणाच्या माध्यमातून  मांडवली करायची, गैरधंदे करायचे, त्यांच्यासाठी हे सर्व थोतांड आहे, (खऱ्या सामाजिक संस्था पदरमोड करून कार्य करतात ). अशी थोतांडखोर पिलावळ आज सर्वत्र निर्माण झाली आहे आणि या पिलावळीची वळवळ प्रस्थापित राजकारण्यांना ही जेरीस आणते, यांच्या योग्य मागण्या सोडून इतर गैरमागण्यांची पूर्तता झाली नाही तर वरील विशेषणांचा भडीमार केला जातो आणि राजकीय क्षेत्राला बदनाम केले जाते. हे बदनाम करणारे उद्याचे नेते ? यांना सूज्ञ मतदार नाकारत असतो मात्र सर्वच एका माळेचे मणी असतील तेथे कुणाचीतरी वर्णी लागते हेच मोठं लोकशाहीचं दु:ख म्हणावे लागेल आणि लोकशाहीचा गळा घोटायलाही अशी पिलावळ कमी करणार नाही ! याच पिलावळीला सांगावेसे वाटते की "राजकारण करु इच्छिणाऱ्या राजकारण्यांनो अवकातीत रहा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।