लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !
लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली;
तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल
नाशिक::- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात १३ सप्टेंबर, २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातून एकूण १३ हजार २०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे १२३ कोटी ८८ लाख ८६ हजार ९६५ रूपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले असून, एक चाळीस वर्षांपूर्वीचा दावा निकाली निघाला आहे. अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुहास भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीत या प्रकरणांवर करण्यात आली तडजोड
मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड
मोटार अपघात प्रकरणात २०१९ साली राज्य परिवहन महामंडळाची बस व ट्रक मध्ये झालेल्या अपघात बसमधील प्रवाशाचा मृत्यू झाला होता. सदर अपघात नुकसान भरपाई प्रकरणात तडजोड होवून मयताच्या वारसास रक्कम रूपये ९२ लाख इतकी नुकसान भरपाई मिळाली. १४ मार्च २०२३ रोजी पक्षकार शरद कोठावदे यांची पत्नी शुभांगी कोठावदे या पार्कसाईड जवळ पायी चालत असतांना वेगाने येणाऱ्या कारने त्यांना बळीमंदिर चौकाजवळ धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. पक्षकारांच्या परस्पर सहमतीने रूपये ८५ लाख रकमेची तडजोड करून वाद निकाली काढण्यात आला. सन २०२३ मध्ये पाटबंधारे विभाग, संगमनेर येथील लिपिक राजकुमार जऱ्हाड हे मोटार सायकल व कार अपघातात मयत झाले होते. लोक अदालतीत उभय पक्षकारांनी परस्पर सहमतीने रूपये ७५ लाख रकमेची तडजोड करून प्रकरण निकाली काढण्यात आले.
४० वर्षापूर्वीचा दावा निकाली
दिंडोरी न्यायालयातील सन १९८५ चा दिवाणी दावा श्रीमती ए.ए.पंडीत व पॅनल सदस्य सीमा केदारे यांच्या समोर दोन्ही पक्षामध्ये झालेल्या समझोत्याने निकाली निघाला.
मोटार वाहन चालकांना दिलासा
नाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालयात एकूण १ हजार ७१५ मोटार वाहन प्रकरणामध्ये २२२ प्रकरणे निकाली निघाली असून सदर वाहनचालकांना न्यायालीयीन प्रकरणांपासून दिलासा मिळाला आहे.
कौटुंबिक वादविवाद असलेल्या प्रकरणांमध्ये तडजोड
लोकअदालतील एकूण १६ कौटुंबिक वाद प्रकरणांमध्ये तडजोड झाली. यामुळे सर्व ८७ प्रकरणांमधील १६ कुटुंबांना संबंध पूर्ववत झाल्याने समाधान मिळाले
निकाली निघालेली प्रकरणे दृष्टीक्षेपात
परक्राम्य संलेख अधिनियम,कलम १३८ अंतर्गतची प्रकरणे – १०९० प्रकरणे
▪️मोटार अपघात प्रकरणे- ३०७ प्रकरणे
▪️कामगार विषयक- ८ प्रकरणे
▪️कौटुंबिक वादातील प्रकरणे- ८७ प्रकरणे
▪️फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे- २५८ प्रकरणे
▪️इतर – २९२८ प्रकरणे
दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण एक लाख ९९ हजार ४४३ इतकी प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी ८ हजार ५२६ प्रकरणे निकाली निघाली असून रूपये ११ कोटी २९ लाख १५ हजार ६७१ रकमेची वसुली झाली असल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुहास भोसले यांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा