कर्मचारी बँक- सरकारी कर्मचारी यांची आधारवड-


कर्मचारी बँक- सरकारी कर्मचारी यांची आधारवड- 
      नाशिक मधील राज्य सरकारी व जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांची नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी ही बँक आधारवड म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी दिनांक २२ सप्टेंबर १९२० रोजी दिंडोरी येथे कै.माधवराव रामचंद्र तथा एम. आर. देशपांडे साहेब यांनी या बँकेची स्थापना केली. सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीसाठी तात्काळ मदत व्हावी आणि त्याचबरोबर त्यांना बचतीची देखील सवय लागावी या दूरदृष्टी विचाराने व उदात्त हेतूने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या बँकेची त्यावेळी स्थापना करण्यात आली.
   आज बँकेला १०२ वर्षे पूर्ण होऊन १०३ व्या वर्षात बँकेने पदार्पण केलेलं आहे. या १०२ वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात बँकेने अनेक चढउतार बघितलेले आहे, आणि अनेक संकटाशी देखील सामना करावा लागला आहे, हे जरी खरी असले तरी त्या त्या वेळी कार्यरत प्रामाणिक संचालक आणि पदाधिकारी यांची बँके प्रति असणारी निष्ठा, सन्माननीय सभासदांचा बँकेवर असणारा अतूट विश्वास आणि त्याचबरोबर बँकेची एक निष्ठेने सेवा करीत असणारे माजी व विद्यमान सेवक वर्ग यांचे योगदान निश्चितच मोजण्या पलीकडे आहे.
       शतकोत्तर वाटचाल करीत असतांना मध्यंतरीच्या  बिकट व प्रतिकूल परिस्थितीत असंख्य संस्था बंद पडल्या परंतु आपली बँक आजही तितक्याच दिमाखदारपणे आणि खंबीरपणे कार्यरत असून सभासदांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहिलेली आहे.
 सुरुवातीला बोहरपट्टी येथे छोट्याशा जागेत सुरू झालेली बँक आता प्रशासकीय कार्यालयासह, रविवार कारंजा, मालेगाव, येवला ,कळवण व भाभानगर अशा एकूण पाच शाखेद्वारे आपली सेवा देत आहे .यात रविवार कारंजा व भाभानगर या दोन शाखा व प्रशासकीय कार्यालय स्व मालकीच्या प्रशस्त जागेत कार्यरत असून या दोन्ही शाखा शहराच्या मध्यवर्ती भागात असून सभासदांना येणे जाण्याच्या दृष्टीने सोयीच्या व जवळ असणाऱ्या आहे.
  बँकेला २०१० मध्ये रिझर्व्ह बँकेकडून अधिकृत लायसन्स प्राप्त झाले .सहकार खाते व रिझर्व्ह बँक यांचे वेळोवेळी पारित झालेले नियम व कायद्यानुसार बँकेने कामकाज केल्याने सन २०१४ मध्ये एकाच वेळी रिझर्व्ह बँकेकडून बँकेला चार नवीन शाखांना परवानगी मिळाली आणि बँकेच्या विस्ताराचा व प्रगतीचा आलेख  वाढायला सुरुवात झाली.  सन २००७ मध्ये एक लाख रुपये इतकी कर्जाची कमाल मर्यादा होती . बहुतेक सरकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हे बँकेचे सभासद झालेले नव्हते. बँक रविवार कारंजा या एकाच ठिकाणी कार्यरत असल्यामुळे तालुका स्तरावर देखील पाहिजे तेवढा बँकेचा प्रचार व प्रसार झालेला नव्हता .  मात्र २०१५ मध्ये मालेगाव, येवला व कळवण या तीन ठिकाणी नवीन शाखा एकाच वेळी चालू करण्यात आल्या.
सभासद वाढीसाठी प्रत्येक कार्यालयाला भेटी देऊन जागृती करण्यात आली. सभासद होण्यासाठी सन्माननीय संचालक व त्याचबरोबर बँकेचे अधिकारी कर्मचारी यांचे कडून आग्रह व विनंती करण्यात येऊ लागली,बँकेच्या योजना सभासदां पर्यंत पोहचविण्यात आल्या आणि त्याला सभासदांकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळाल्याने सभासद वाढ मोठया प्रमाणावर झाली. खऱ्या अर्थाने  त्यामुळे बँकेच्या प्रगतीचा आलेख अधिकच विस्तारला. 
  दिनांक ३० सप्टेंबर २०२२ अखेर बँकेची सभासद संख्या     १५ हजार ९४९ इतकी असून भाग भांडवल रुपये १९ कोटी ३४ लाख, राखीव व इतर निधी २२ कोटी ५३ लाख, एकूण ठेवी ३३३ कोटी ५६ लाख ,कर्जवाटप २०६ कोटी ९७ लाख, गुंतवणूक १४७ कोटी २८ लाख व  खेळते भांडवल ३७८ कोटी ८४ लाख इतके झाले आहे. बँकेच्या असणाऱ्या उत्तम कामकाजामुळे  मागील १३ वर्षांपासून बँकेला लेखापरीक्षणात  सातत्याने ऑडिट वर्ग अ मिळत आहे. बँकेचे संचालक मंडळ शिस्त,गुणवत्ता आणि पारदर्शकता या त्रिसुत्रीच्या आधारे  काम करीत आले असून यापुढेही करत राहील.
    बॅंकेमार्फत सभासदांना दिल्या जाणाऱ्या नियमित कर्जाची मर्यादा नुकतीच १५ करून २० लाख इतकी करण्यात आली आहे तर वाहन कर्ज चार चाकी साठी १५ लाख, शैक्षणिक कर्ज ३ लाख शैक्षणिक साहित्य कर्ज ५० हजार ,सोनेतारण कर्ज ५ लाख इतके देत आहे .
    बँकेने सभासदांना स्वतःच्या हक्काचे घर व्हावे यासाठी नुकतीच ८.९० % या अल्प व्याजदरात गृह कर्ज योजना कार्यान्वित केली आहे. कर्जाची कमाल मर्यादा ५० लाख इतकी ठेवण्यात आलेली आहे .
     बँकेने नुकतीच बँकेमार्फतच चेक क्लिअरिंगसाठी सिटीएस कार्यप्रणाली चालू केली आहे. बँकेतून आरटीएस व एन ई एफ टी ही सुविधा  सुरू केलेली आहे . तथापि ही सुविधा अन्य बँकांच्या मदतीने घेत असल्याने शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी अडचणी येतात आणि म्हणून ही सुविधा देखील आपल्याच बँकेमार्फत चालू करण्यात येणार आहे त्यामुळे सभासदांना तात्काळ आणि शनिवार रविवारी देखील ही सुविधा आपण देवू शकणार आहोत.सभासदांच्या सोयीसाठी नाशिक मधील रविवार कारंजा व भाभानगर या शाखा सकाळ सायंकाळ या सत्रात कार्यरत असून मालेगाव ,येवला व कळवण या शाखा नियमित वेळेत चालू ठेवण्यात आलेल्या आहेत. बँकेच्या भाभानगर या शाखेत लॉकर सुविधा सुरू करण्यात आलेली असून यासाठी कोणतीही ठेव न घेता फक्त वार्षिक भाडे घेऊन ही सुविधा पुरविण्यात येत आहे. सभासदांना रिकरिंग ठेवीसाठी तसेच कर्जदारांना मासिक हप्ता भरण्यासाठी इसीएस ही कार्यप्रणाली सुरू केली असून फोन पे व गुगल पे द्वारे देखील हप्ते भरण्याची सोय बँकेने उपलब्ध करून दिली आहे, याचा असंख्य सभासद लाभ घेत आहेत यामुळे नक्कीच त्यांच्या वेळेत  व पैशात  मोठी बचत होतआहे . तसेच यापुढे मोबाईल बँकिंगच्या प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून त्यांचे मंजुरीनंतर ही सुविधा देखील आपण लवकरच चालू करणार आहोत.यापुढेही बँक सभासद व बँक हित डोळ्यासमोर ठेवून सभासदांना आधुनिक व अद्यावत बँकिंग सेवा पुरविण्याचा  बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षा  व संचालक मंडळाचे ध्येय असणार  आहे. सभासदांचा मिळत असणारा सहभाग आणि बँके प्रति त्यांचा असणारा विश्वास यामुळे बँकेची ही यशस्वी घोडदौड यापुढेही अशीच चालू राहील यात शंकाच नाही आणि म्हणूनच सरकारी व जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांना ही बँक आपला आधारवड वाटत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।