पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणणे हे मुख्य उद्दिष्ट- उज्ज्वल निकम

पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणणे हे मुख्य उद्दिष्ट- उज्ज्वल निकम, ज्येष्ठ विधीज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.  
          नाशिकः- वकिली व्यवसायात कार्यरत असताना अनेक आव्हानात्मक खटले हाताळण्याची संधी मिळाली. त्यातीलच अझमल कसाब या खटल्याच्या माध्यमातून कसाबला केवळ फाशी देणे, हे उद्दिष्ट नव्हते पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणणे हे मुख्य उद्दिष्ट होते, असे मत ज्येष्ठ विधीज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. 
          अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात आज अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणेतर्फे देण्यात येणारा २०२२ चा जीवनगौरव पुरस्कार पॉप्युलर प्रकाशनाचे संचालक रामदास भटकळ यांना, तर साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ लेखक आणि कवी प्रवीण दवणे यांना आज ज्येष्ठ विधीज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि विश्वास बँक लि., नाशिकचे संस्थापक विश्वास ठाकूर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत निकम बोलत होते. 
यावेळी व्यासपीठावर या संमेलनाचे अध्यक्ष मॅजेस्टिक प्रकाशनाचे संचालक अशोक कोठावळे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणेचे अध्यक्ष राजीव बर्वे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास पोतदार, नाशिक शाखेचे कार्यवाह सुभाष सबनीस, नाशिक शाखेचे उपाध्यक्ष वसंत खैरनार आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणेचे प्रमुख कार्यवाह पराग लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
          यावेळी  संवेदना प्रकाशन पुरस्कृत मुद्रित शोधनातील विशेष पुरस्काराने सुषमा देशपांडे यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ग्रंथनिर्मिती पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले. तसेच नाशिकमधील काही साहित्य संस्थांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था, नासिक सत्कार करण्यात आला. सदर सन्मान अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष सुभाष सबनीस, सचिव प्रकाश उखाडे, पुंजाजी मालुंजकर, जी.पी.खैरनार, अरूण बिडवे, तेजश्री उखाडे आदिंनी स्विकारला.
         यावेळी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, रेणुका आणि सीमा गावित या गावित भगिनींना फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा तो माझ्या करिअरच्या समाधानाचा सर्वोच्च टप्पा होता. कोल्हापूर न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मी जेव्हा न्यायालयाच्या बाहेर आलो, तेव्हा या खटल्याशी दुरान्वये नसलेली ५०-५५ मुले बाहेर साखर वाटण्यासाठी उभी होती. मी मुंबईच्या तुलनेत जळगावसारख्या छोट्या शहरात जन्मलो, वाढलो, मराठी शाळेत शिकलो तरी मी माझ्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ दिला नाही. तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा असेल, तर ती आपोआप जिभेवर येते आणि ती व्यक्त देखील होते. माझ्यातील हा ऊर्जास्त्रोत बघूनच बहुदा अनेक आव्हानात्मक खटले माझ्याकडे चालत आले. मी विज्ञानाचा विद्यार्थी होतो आणि मला वकिली क्षेत्रात यायचे नव्हते. माझ्या आईला मी डॉक्टर व्हावे, असे वाटत होते तर मी वकिल व्हावे, असे वडिलांना वाटत होते. अखेर मी वकिली क्षेत्रात आलो. मी विज्ञानाचा विद्यार्थी असूनही माझे मराठी भाषेवर प्रचंड प्रेम आहे. ऐतिहासीक कादंबऱ्या वाचण्याचा छंद मला पहिल्यापासून होता. अनुभवाने मी माणसांचे चेहरे वाचायला लागलो, त्यांना ओळखायला लागलो. त्याचा मला माझ्या व्यवसायात फायदा झाला. 
          यावेळी पुरस्काराला उत्तर देताना रामदास भटकळ म्हणाले की, वयाची ८० वर्षे ओलांडल्यानंतर कोणताही पुरस्कार स्वीकारायचा नाही, हा ग.प्र. प्रधान यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी वाटचाल करीत होतो. तोच आदर्श ठेवत अनेक पदे आणि पुरस्कार मी नाकारले. मात्र, आजचा पुरस्कार हा अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा पुरस्कार असल्याने आणि पॉप्युलर प्रकाशनाने आता शताब्दित पदार्पण केल्याने मी हा पुरस्कार स्वीकारला. पॉप्युलर प्रकाशन शताब्दीमध्ये प्रवेश करीत असताना कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यापासून, कुटुंबियांपासून, ज्या लेखकांच्या लेखणीमुळे पॉप्युलर प्रकाशनाचा नावलौकीक झाला, त्या सर्व लेखकांविषयी मी कृतज्ञता भाव बाळगतो. पॉप्युलर प्रकाशनाने कधीही तात्कालीक महत्त्व लक्षात घेऊन पुस्तके प्रकाशित केली नाहीत, तर त्या साहित्याचे दीर्घकालीन मूल्य लक्षात घेऊनच पुस्तके प्रकाशित केली. 
           यावेळी पुरस्काराला उत्तर देताना प्रवीण दवणे म्हणाले की, लेखक एकांतात एकटाकी लेखन करीत असतो. मी कधीही कुठल्याही गटातटात न अडकता साहित्यसेवा करीत राहिलो. मला आज मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझ्या प्रदीर्घ लेखन कौशल्याचा सन्मान आहे, असे मी मानतो. अलीकडे लोक वाचत नाहीत किंवा श्रोते कार्यक्रमांना येत नाहीत अशी ओरड असताना माझी पुस्तके प्रचंड संख्येने विकली जातात आणि माझ्या कार्यक्रमांना प्रचंड जनसमुदाय जमत असतो. तुम्ही पोटतिडकीने काम करीत असाल, तर तुमच्या सगळ्या उपक्रमांना यश मिळतेच. पुरस्कार मिळाल्याने हुरळून जाण्याचे वय नसले तरी, पुरस्काराने उमेद मिळण्याचे वय अजूनही आहे आणि या पुरस्कारामुळे मला ती उमेद मिळाली आहे. मी लेखनाला सुरूवात केली, तेव्हा दिग्गज प्रकाशकांनी माझ्या साहित्याची कच्ची टिपणे वाचून त्यात सुधारणा सुचवल्या. माझ्या जडणघडणीच्या एका टप्प्यापर्यंत त्या दिग्गज प्रकाशकांचा देखील वाटा आहे. अलीकडच्या प्रकाशकांनी देखील लेखक- कवी घडवण्याची प्रक्रीया पुनर्जीवीत करावी. लेखक आणि प्रकाशकांनी हातात हात घालून साहित्य प्रचार-प्रसाराचे कार्य पुढे न्यावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणेचे मधुर बर्वे यांनी केले. 
*************************************
 

        अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात आज  अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणेतर्फे देण्यात येणारा २०२२ चा जीवनगौरव पुरस्कार  पॉप्युलर प्रकाशनाचे संचालक रामदास भटकळ यांना, तर साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ लेखक आणि कवी  प्रवीण दवणे यांना आज ज्येष्ठ विधीज्ज्ञ विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी (डावीकडून)  सुभाष सबनीस, विलास पोतदार, वसंत खैरनार, विश्वास ठाकूर, निकम, प्रवीण दवणे, अशोक कोठावळे, रामदास भटकळ, राजीव बर्वे आणि पराग लोणकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !