स्वराज्य मिळालं असलं तरी त्याचं सुराज्य करणं हाच आपल्या गणेशोत्सवाचा संकल्प असला पाहिजे - सांस्कृतिक मंत्री

स्वराज्य मिळालं असलं तरी त्याचं सुराज्य करणं हाच आपल्या गणेशोत्सवाचा संकल्प असला पाहिजे - सांस्कृतिक मंत्री

        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२२' या  स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वा. रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. 

या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय,  सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव श्रीमती विद्या वाघमारे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे उपस्थित होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी मंडळाना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. 

        पर्यावरणपूरक मूर्ती,  पर्यावरणपूरक सजावट, सामाजिक संदेश देणारे, सामाजिक उपक्रम, समाज प्रबोधन, विकासाभिमुख देखावे, ध्वनी प्रदूषण रहित वातावरण, रक्तदान शिबीर तसेच वैद्यकीय शिबिर इत्यादींचे आयोजन, महिला ग्रामीण, वंचित घटक, शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादीबाबत मंडळाने केलेले कार्य, पारंपरिक/ देशी खेळांचे आयोजन आणि गणेश भक्तांसाठी मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्राथमिक सुविधा अशा अनेक निकषांच्या आधारे ३६ जिल्ह्यातील ३५६ पेक्षा अधिक मंडळांतून अंतिम ३ उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना म्हणजेच  'श्री खंडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पातूर, अकोला' यांना प्रथम पारितोषिक (रोख रुपये ५,००,०००/-  व प्रमाणपत्र), 'सुवर्णयुग तरूण मंडळ, पाथर्डी, अहमनगर' यांना द्वितीय पारितोषिक (रोख रुपये २,५०,०००/- व प्रमाणपत्र) आणि 'स्वप्नाक्षय मित्र मंडळ, अंधेरी, मुंबई उपनगर' यांना तृतीय पारितोषिक (रोख रुपये १,००,०००/- व प्रमाणपत्र) देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

तर जिल्हास्तरावर एकविरा गणेशोत्सव मंडळ, अमरावती, कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ, औरंगाबाद, जय किसान गणेश मंडळ, बीड, आदर्श गणेश मंडळ, भंडारा, सहकार्य गणेश मंडळ, चिखली, बुलढाणा, न्यू इंडिया युवक गणेश मंडळ, भानापेठ वॉर्ड, चंद्रपूर, श्री संत सावता गणेश मंडळ, सोनगीर, धुळे, लोकमान्य गणेश मंडळ, आरमोरी, गडचिरोली, नवयुवक किसान गणेश मंडळ, देवरी, गोंदिया, श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एनटीसी, हिंगोली, जागृती मित्र मंडळ, भडगाव, जळगाव, संत सावता गणेश मंडळ, परतुर, जालना, श्री गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी, कोल्हापूर, बाप्पा गणेश मंडळ, लातूर, पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ना.म. जोशी मार्ग, मुंबई शहर, विजय बाल गणेश उत्सव मंडळ, किराडपुरा, नागपूर, अपरंपार गणेश मंडळ, नांदेड, क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ, नंदुरबार, अमरज्योत मित्र मंडळ, सातपूर, नाशिक, बाल हनुमान गणेश मंडळ, उस्मानाबाद, साईनाथ मित्र मंडळ, नालासोपारा, पालघर, स्वराज्य गणेश मंडळ, देवनांदरा, परभणी, जय जवान मित्र मंडळ, नानापेठ, पुणे, संत रोहिदास तरुण विकास मंडळ, महाड, रायगड, पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मंडणगड, रत्नागिरी, तिरंगा गणेशोत्सव मंडळ, विटा, सांगली, सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावली, सातारा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवडा, सिंधुदुर्ग, श्रीमंत मानाचा कसबा गणपती, सोलापूर, धामणकर नाका मित्र मंडळ, भिवंडी, ठाणे, मंत्रीपार्क गणेशोत्सव मंडळ, वाशिम, नवयुग गणेश मंडळ, यवतमाळ या मंडळांनाही  रोख रक्कम रुपये २५,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा माननीय मंत्राच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 
         यावेळी आपल्या मनोगतात सुधीर मुनगंटीवार यांनी विजयी गणेश मंडळांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. "गणेशोत्सवाच्या माध्यमातून सेवाभावी उपक्रम करणारी अनेक मंडळं अजूनही अस्तित्वात आहेत. जी गणेशोत्सव साजरा करताना समाजाच्या विविध प्रश्नांची दखल घेत, त्याबाबत चिंता व्यक्त करत या समस्यांतून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. समाजप्रबोधनाचं कार्य करतात. ही खूपच आनंद  देणारी गोष्ट आहे. चांगल्या विचारांचा प्रसार प्रचार आपल्या सारख्या गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून व्हावा ही या स्पर्धेमागची शासनाची भूमिका आहे. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत स्वराज्य मिळालं असलं तरी त्याचं सुराज्य करणं हाच आपल्या गणेशोत्सवाचा संकल्प असला पाहिजे." असं ते म्हणाले. 
        यावेळी बाळासाहेब सावंत, शुभांगी पाटील व समूहाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे संयोजन व समन्वयन शुभंकर करंडे आणि राकेश तळगांवकर यांनी संतोष रोकडे व श्रीमती विद्या वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. सदर कार्यक्रमास राज्यभरातून विजेत्या मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

,,,,,,, सावधान, नाशिकमधील किटल्या गरम होऊ लागल्या आहेत !