पापडीवाल दाम्पत्याच्या अतूट श्रद्धेचा भक्तिमय प्रत्यय ! जयजयकारात महामस्तकाभिषेक संपन्न !


पापडीवाल दाम्पत्याच्या अतूट श्रद्धेचा भक्तिमय प्रत्यय !
जयजयकारात महामस्तकाभिषेक संपन्न !
ऋषभदेवपुरम- मांगीतुंगी(प्रतिनिधी) शुक्रवार ( दि.१) सौ. अंजली पापडीवाल यांनी आपल्या अतूट श्रद्धेचा, निस्सीम भक्तीचा प्रत्यय कृतीद्वारे दिला. मुलगा जीनेश व सून सुरभी यांचा एकाच दिवशी वाढदिवस असल्याने त्यानिमित्ताने संपूर्ण पंचामृत अभिषेक केला. सलग १७ दिवस सुरू असलेल्या महामस्तकाभिषेक महोत्सवात काल शुक्रवारी ( दि.१) आनंदमय वातावरणात भाविकांनी ऋषभदेव व सर्व तीर्थंकरांच्या नावांनी जयघोष केला. उपस्थित सर्व श्रावक- श्राविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा व रत्नवृष्टीचा सात्विक आनंदही मिळवला. भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटीचे महामंत्री संजय पापडीवाल यांच्या सौ. अंजली धर्मपत्नी आहेत. या दाम्पत्याने आपल्या वडिलांचा वारसा जपला आहे.

       शुक्रवार ( दि.१) पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथून ऋषभगीरीवर जाण्यासाठी रीघ लागली होती. सकाळपासून  पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक करून धन्य झाल्याची भावना अंजली पापडीवाल यांनी व्यक्त करताच टाळ्यांचा वर्षाव झाला.

पापडीवाल दाम्पत्याचा गेल्या अनेक दिवसांपासून येथेच मुक्काम आहे. सौ. अंजली दररोज मूर्तीसमोर बसून कापडावर भक्तांम्बर स्तोत्राचे लेखन करतात.

महामस्तकाभिषेकाच्या प्रारंभी संकल्प, प्रार्थना यांचे पौरोहित्य हस्तिनापूरचे प्रधान आचार्य विजय जैन व सत्येंद्र जैन यांनी केले. पवित्र जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पंचामृताभिषेक करून भाविकांनी पुण्यप्राप्ती केली. प्रथम कलश ओडिशाच्या बालगीर येथुन आलेल्या रामोतार जैन यांनी तर शांतीधारा कलश हरिनगर (दिल्ली ) येथील सौरभ जैन व अहमदाबादचे मुकेश कासलीवाल यांनी अर्पण केले. हरिद्रा अभिषेक लातूरच्या निशिकांत प्रेमचंद यांनी तर भोपाळच्या अनुपमा जैन व हिरापूरचे अंकित जैन यांनी रत्नवृष्टी केली.

   महामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठाता सी. आर. पाटील, चंद्रशेखर कासलीवाल, राजेंद्र कासलीवाल, रोशन केलावत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मंगलाचरणाने प्रारंभ होऊन स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. जीवनप्रकाश जैन यांनी केले. हस्तिनापूर येथून ऑनलाईन सहभागी झालेल्या परमपूज्य आर्यिकारत्न डॉ. चंदनामती माताजी व गणिनिप्रमुख श्री ज्ञानमती माताजी ऑनलाईन संवाद साधताना म्हणाल्या, "मांगीतुंगी सिद्धक्षेत्र येथे सतरा दिवसांपासून सोहळा सुरू आहे.  देशभरातील १ लाखापेक्षा जास्त भाविक सहभागी झाले. दि. १० जुलै पर्यंत पुण्यवान भाविकांना संधी मिळणार आहे. त्याचा लाभ घेऊन भाविकांनी सहकुटुंब येऊन, दर्शन, अभिषेक, पूजनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी बोलताना त्यांनी केले."
         सजवलेल्या पंचामृत कलशांमध्ये शेकडो लिटर नारळपाणी, ऊसाचा रस, तूप, दूध, दही, सर्वौषधि तसेच हरिद्रा, लालचंदन, श्वेत चंदन, चतुष्कोण कलश, केशर, सुगंधी फुले, यांचा समावेश करण्यात आला. राजस्थानातील भरतपूर  येथून आलेले गायक संतोष यांनी सुमधुर भजनांनी वातावरणात पावित्र्य निर्माण केले. दिवसभर लांबलांबून भाविकांची वर्दळ सुरू होती.  उत्तरोत्तर भाविकांची गर्दी वाढत असून त्याचे सुयोग्य नियोजन अध्यक्ष पीठाधीश रवीन्द्रकिर्ति स्वामीजी, महामंत्री संजय पापडीवाल व ट्रस्ट मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. निवास, भोजन व वाहतूक व्यवस्था प्रमुख विशेष परिश्रम घेत आहेत. आता यापुढे महामस्तकाभिषेकाचे शेवटचे १० दिवस राहिल्याने कालही सायंकाळी परगांवाहून येणाऱ्या भाविकांची गर्दी होती.
************************************
 महामस्तकाभिषेकची मुदत 
वाढल्याने भाविक आनंदीत
  दि.१५ ते ३० जूनपर्यंत मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव महामस्तकाभिषेक सोहळा सुरू होता. जगभरातील भाविकांच्या मागणीनुसार ही मुदत दि. १० जुलैपर्यंत पीठाधीश स्वामीजी रवींद्रकीर्ती यांनी वाढवली.अशी माहीती महामंत्री संजय पापडीवाल यांनी दिली. त्याचे समस्त भाविकांनी स्वागत केले. काल मध्यप्रदेशातील इंदोर, गुजरातमधील सूरत, अहमदाबाद, राजस्थानातील जयपूर तसेच ओडिशा येथून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।