सहकाराचे चारित्र्य अबाधित ठेवणे नागरी सहकारी बँकांचे कर्तव्य-खा. सुरेश प्रभू

सहकाराचे चारित्र्य अबाधित ठेवणे नागरी सहकारी बँकांचे कर्तव्य-खा. सुरेश प्रभू

            नाशिक (प्रतिनिधी) : भविष्यात सहकार क्षेत्राला उज्वल दिशेकडे नेण्यासाठी सहकारातील मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याची गरज असून सहकार क्षेत्राने सर्वस्पर्शी जाणिवेतून काम करण्यासाठी एकत्रित विचारातून विकासाच्या संकल्पना रूजवाव्यात. त्यासाठी काळाबरोबरच बदलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे तितकेच महत्वाचे आहे. तंत्रज्ञान, मार्केटिंग याबरोबरच सहकाराचे चारित्र्य अबाधित ठेवणे व संस्थेचा विकास यांचा समतोल राखणे संस्थेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व ठरेल. समाजाचा विकास करण्यासाठी ग्राहकांशी वैयक्तिक पातळीवर नाते जोडून बँकांनी ग्राहकाभिमुखता जपावी. सहकार ही उद्याच्या काळाची गरज आहे ती अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी आत्मपरिक्षण करण्याबरोबरच सहकारातील सात्विकता जपावी. सहकार हे उद्याच्या जगाचे प्रभावी माध्यम असेल असे प्रतिपादन माजी रेल्वे मंत्री, भारत सरकार तथा चेअरमन-न्यू ड्राफ्ट पॉलिसी (को-ऑप.), सहकार मंत्रालय, भारत सरकारचे खा. सुरेश प्रभू यांनी केले.
           

  दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईतर्फे दरवर्षी दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. सन २०२१-२२ चा २५ वा (रौप्य महोत्सवी) पुरस्कार वितरण सोहळा ‘गुरूदक्षिणा’, गोखले एज्युकेशन सोसायटी प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी विद्यानगर कॉलेजरोड, नाशिक येथे संपन्न झाला. २४ वर्षांनंतर प्रथमच मुंबई बाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. सदर पुरस्कार सोहळ्याचे कॉर्पोरेट स्वरूपाचे आयोजन करण्यात आले होते. 

       कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे म्हणाले की, सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी संयुक्त प्रेरणेच्या जाणिवेतून एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. सध्याचे युग हे स्पर्धात्मक असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच युवा पिढीचा सहभाग घेणे म्हणजेच सहकाराच्या समृद्धीची यशस्वी वाटचाल करेल. सहकाराची पारदर्शकता, विश्वासार्हता आणखी गतीमानतेने वाढवण्यासाठी नागरी सहकारी बँकांनी स्वयंपूर्णतेणे काम करण्याबरोबरच व्यवस्थापनातील सिद्धता, कौशल्य विकास, मुल्य व्यवस्था, सामाजिक योगदान, सामाजिक दायित्व यांचा अंगीकार करावा. कुशल मनुष्यबळ हे संस्थेच्या गुणात्मक वाटचाल गतीमान होण्यासाठी महत्वाचे पाऊल आहे. त्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळांमार्फत बँकांचा आधुनिक वाटचालीचा मार्ग सुकर होईल. पुरस्कार म्हणजे आपल्या कामाची पोचपावती असते व त्यातून पुढील वाटचालीला बळ मिळत असते. त्यासाठी सहकारात काम करणार्‍यांनी ध्येय निष्ठेने काम करावे. 

           कार्यक्रमाचे स्वागत करताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनचे उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर म्हणाले की, असोसिएशनतर्फे देण्यात येणारे पुरस्कार हे गुणात्मकता व व्यवस्थापनातील नाविन्यता यांचा विचार करून व त्यांचे कामकाजातील सातत्य यांचा समन्वय करून देण्यात येतात. नागरी सहकारी बँका आज व्यवसायिक बँकांशी स्पर्धा करण्यात अग्रेसर ठरल्या आहेत. त्याचेच हे पुरस्कार वितरण म्हणजेच एक आदर्श उदाहरण आहे. बँकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची आधुनिक विचार व कामातील गुणवत्ता यांची ही नोंद पुरस्काराच्या निमित्ताने घेतली आहे.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत मुलभूत आर्थिक वाहिनी म्हणून सहकाराचे स्थान आहे. ती समाजाची गरज आहे. नागरी सहकारी बँक आज देशाचेच नव्हे तर जगाच्या अर्थव्यवस्थेची गरज ठरली आहे. नागरी सहकारी बँकांची गुणवत्ता किती प्रभावी व लक्षणीय आहे याचे उत्तर म्हणजे असोसिएशनचा हा पुरस्कार वितरण सोहळा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व सहकार विभागाचे निकष घेऊन अत्यंत पारदर्शकपणे हे पुरस्कार दिले जातात. सहकाराचे विकासात्मक चित्र हे विश्वासार्हता या बळावर टिकून आहे याचाही ठाकूर यांनी उल्लेख केला.
            पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने असोसिएशनच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत असलेल्या वाटचालीचा अभ्यासपूर्ण वेध घेणार्‍या सन्मानार्थी स्मरणिकेचे तसेच असोसिएशनचे मुखपत्र असलेल्या ‘क्षितिज’ च्या अंकाचे प्रकाशन उपस्थितांच्या शुभहस्ते संपन्न झाले व वेबसाईटच्या नूतनीकरणाचे उद्घाटन झाले.
           महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा म्हणाले की, असोसिएशनतर्फे दिले जाणारे पुरस्कार हे उत्तम काम करणार्‍या बँका, अधिकारी व कर्मचारी यांना वाटचालीला बळ देणारे आहे. सहकारातील आधुनिक संकल्पना रूजवणार्‍या नागरी सहकारी बँका, अधिकारी व कर्मचारीही संस्थेची शक्ती आहे.
          सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे म्हणाल्या की, सहकार क्षेत्र हे प्रगतीशील असून आज वैभवशाली आर्थिक क्रांती म्हणून सहकाराचे महत्व आहे. सहकारातील प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटीने प्रयत्नांची गरज आहे. सहकार ही समाजाची गरज आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात नागरी सहकारी बँका व अधिकारी, कर्मचारी यांना सन्मानीत करण्यात आले.
पुरस्कारार्थींच्यावतीने कै. विष्णू अण्णा पाटील जीवनगौरव पुरस्काराबद्दल अरविंद पोरेड्डीवार, सुशिलादेवी देशमुख स्मृती पुरस्काराबद्दल कमलादेवी विजयकुमार राठी व सहकार महर्षि बाळासाहेब घुईखेडकर उदयोन्मुख तरुण सहकारी पुरस्काराबद्दल शरण बसवराजजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. चंद्रकांत संकलेचा, मंगेश पंचाक्षरी व डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. आभार प्रदर्शन असोसिएशनचे संचालक राजेंद्र (नाना) सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास असोसिएशनचे संचालक गुलाबराव देवकर, डॉ. दिगंबर दुर्गाडे, प्रंचित पोरेड्डीवार, रूपा देसाई-जगताप, भाऊ कड, सुभाष जोशी, रविंद्र दुरुगकर, कैलास जैन, जगन्नाथ बिंगेवार, राजेंद्र महल्ले, दिलीप चव्हाण, योगिनी पोकळे, किशोर रांगणेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आव्हाड उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !