चळवळ म्हणजे काय रे भाऊ..? गिरणा गौरव प्रतिष्ठान !

चळवळ म्हणजे काय रे भाऊ..?
गिरणा गौरव प्रतिष्ठान !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

      'जिथे असते नदी तिथे नांदते समृद्धी' असं आजवर आपण म्हणत आलो आहोत. नदीच्या उगमापासून तर तिच्या सागराला मिलनापर्यंत नदी फक्त आणि फक्त समृद्धी वाटण्याचं काम करत असते. याच नदीचा आदर्श घेऊन नाशिक जिल्ह्यातील, कळवण तालुक्यातील गिरणा च्या काठावर वसलेल्या गिताईनगर अभोणा  गावातून आलेला एक तरुण प्रेरित होतो आणि तो समाजासाठी काहीतरी करू पाहतो. त्याच्या त्या चळवळीचं नाव म्हणजे 'गिरणा गौरव प्रतिष्ठान' ! खरंतर इतिहासात डोकावून पाहिले असता आपल्याला अनेक चळवळी पाहता येतात. स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी उभारलेली क्रांतिकारी चळवळ असेल, समाजाच्या उन्नतीसाठी आणि उत्थानासाठी सामाजिक चळवळ असेल संस्कृतीच्या संवर्धनासाठी उभारलेली सांस्कृतिक चळवळ असेल, राजकारणातील राजकीय चळवळ असेल किंवा अशा अनेक चळवळी आपल्याला माहीत असतील. चळवळ हा एक क्रांतिकारी शब्द आहे आणि त्यातून काहीतरी भलं घडण्याची घडण्याचे अभिप्रेत आहे. सुरेश पवार हा एक तरुण या चळवळ शब्दाने प्रेरित होतो आणि तो आपल्यासमोर 'गिरणा गौरव प्रतिष्ठान' घेऊन येतो.

खरंतर गिरणा गौरव प्रतिष्ठान ही एका दिवसात उभी राहिलेली चळवळ नाही त्या चळवळीच्या मागे काहीतरी सामाजिक अधिष्ठान नक्की आहे. माणसाच्या मनात विचार येतो आणि त्या विचाराला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्याला धडपड करावी लागते. सुरेश पवार नाशिक मध्ये २५ वर्षांपूर्वी नव्याने आलेल्या सकाळ वृत्तपत्र समूहाशी जोडले गेले. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण मानतो आणि या स्तंभावर काम करण्याची संधी सुरेश पवारांना मिळाली. खरंतर ग्रामीण भागातून आल्यामुळे गावकडची  माती आणि माणसं जपत त्यांनी आपल्या समाजाचं दुःख या माणसाला नीट माहीत होतं. नाशिकमध्ये आल्यानंतरही समाजात असलेली गरीब श्रीमंताची दरी या माणसाला दिसू लागली आणि त्यातूनच त्याचं प्रतिबिंब त्यांच्या पत्रकारितेत दिसू लागलं. या माणसाने वृत्तपत्रातून लेखन करताना रात्रीचं जागं असणारं नाशिक लिहिलं, स्मशानभूमीतलं नाशिक लिहिलं. त्यासाठी पंधरा दिवस स्मशानभूमीत हा माणूस जाऊन राहिला. हमालाचं दुःख लिहिलं, रस्त्यावरती फुटपाथवरती चप्पल व्यवसाय करणाऱ्या माणसाचं दुःख लिहिलं. एवढेच नव्हे तर चणे फुटाणे विकणारा असेल, भंगार विकणारा असेल किंवा अगदीच लाल वस्तीत पोटापाण्यासाठी व्यवसाय करणाऱ्या महिला असतील या सर्वांचं दुःख सुरेश पवार या अवलियाने लिहिलं. 


      वेळ मिळेल तसं नाशिकचे साहित्यिक दैवत असणारे कवी कुसुमाग्रज यांच्याकडे ते जाऊन बसत आणि साहित्यिक धडे गिरवत असत. तात्यासाहेबांशी बोलतानाच गोदागौरव या कार्यक्रमाबद्दल सुरेश पवारांना समजलं. आपणही गिरणा नदीच्या काठावरून आलो आहोत; आपणही गोदा गौरव सारखं गिरणा गौरव या नावाने काहीतरी सुरू करावं असा विचार त्यांच्या मनात आला. सुरुवातीला कसमादे पट्ट्यातील गुणवंतांचा शोध घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी असं त्यांना वाटलं. परंतु सामाजिक काम करताना आर्थिक पाठबळ असणेही गरजेचे असते. त्यासाठी त्यांची शोधाशोध सुरू झाली. प्रत्येकाकडे जाऊन मनातील संकल्पना त्यांनी मांडल्या. सुरुवातीला कोणी फारसं तयार झालं नाही परंतु ज्या कुणाला हे समजलं त्यांनी सुरेश पवारांना आम्ही सोबत असल्याची ग्वाही दिली आणि हा माणूस कामाला लागला. त्यातूनच पहिला कार्यक्रम संपन्न झाला, ज्येष्ठ पत्रकार सुरेश अवधूत, मोतीराम पिंगळे, न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील, केदा आहेर, सयाजी पगार, सुभाष शहा, नितीन शेवाळकर, ब्रिज मोहन शुक्ला, अशोक जाधव, हेमंत चंद्रात्रे, निशिकांत भालेराव, साहेबराव गायकवाड, अशोक चौधरी, निवेदिका उन्नती बागुल, किशोर यशोद, मिलिंद यशोद ही माणसं सुरेश पवारांना भेटली आणि गिरणाच्या चळवळीला सुरूवात झाली. या चळवळीचे साक्षीदार होते कर्मवीर दादासाहेब बिडकर अँड. उज्वल निकम जिल्हा उपनिबंधक डॉ. विजय सूर्यवंशी, गिरणा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. जे.डी पवार, तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर गजभिये, डॉ .एकनाथ पगार डॉ. रावसाहेब शिंदे, महापौर डॉ. शोभाताई बच्छाव,वनमंत्री ना. ए. टी .पवार, आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर, सुधाकर कोठावदे, एकनाथ जाधव, परिवहन मंत्री ना. प्रशांत हिरे, डॉ. सुगंध बरठं, केशरीचंद मेहता आदी दिग्गज मंंडळी या चळवळीचे साक्षीदार आहेत. त्यांच्या शुभेच्छांनी सुरेश पवारांचा हुरूप वाढला  आणि त्यानंतर सुरेश पवारांनी मागे वळून पाहिले नाही. आज रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असताना सुरेश पवारांच्या कामाचा आवाका आपल्याला चकित करून जातो. या व्यासपीठावर अनेक गुणवंतांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेताना या माणसाने प्रत्यक्ष तिथे जाऊन त्यांचं कार्य बघितलं आहे. परंतु जेव्हा आपण गुणवंतांच्या पाठीवर थाप ठेवतो त्यावेळेला त्यांचा सन्मान करणारे हातही तितकेच पवित्र असावे लागतात. म्हणून अशा पवित्र हातांचा सुरेश पवारांनी शोध घेतला आणि त्या शोधातून या मंचावर ज्ञानपीठ विजेते अगदी पद्मश्री पुरस्कारापर्यंतचे अनेक मान्यवर येऊन गेलेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला सत्कार, सन्मान होतो आहे म्हटल्यावर सत्कारार्थी भारावून गेले आणि त्यातून त्यांना त्यांच्या कार्याची अधिकची प्रेरणा मिळाली. सुरेश पवारांनी 'पैशाला पैसे जोडूया' असं म्हटलं असतं तर हा माणूस आज आपल्याला गर्भश्रीमंत झालेला दिसला असता पण तसं न म्हणता 'माणसाला माणूस जोडू या' असं म्हणत अखंडपणे माणूस मंत्र जपत या माणसाने फकीरी पत्करली. सुरेश पवार यांचे कामाचे नियोजन, बोलण्याचे कसब, माणसांना आपलं करण्याची वृत्ती आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याची संस्कृती या स्तंभांवरती गिरणा गौरव प्रतिष्ठान आज रोप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. गिरणा गौरव प्रतिष्ठानने गेल्या पंचवीस वर्षात तंटामुक्त अभियान, ग्राम स्वच्छता अभियान, गर्भसंस्कार, व्यसनमुक्ती, चिंतन शिबिर, शिक्षकांसाठी नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार आदी ठिकाणी दरवर्षी कार्यशाळा, ४५ जोडप्याचे सामुदायिक विवाह,  वकृत्व स्पर्धा, ७५००० पवारांचे अधिवेशन, साहित्य मेळावा शेकोटी लोककला साहित्य संमेलन सारखा अभिनव उपक्रम राबवून  संपूर्ण भारतात साहित्याचा जागर केला. १८००० झाडे लावुन पर्यावरण चा जागर, पंढरपूर पायी वारीचे आयोजन,वाघ्या मुरळी चे जिल्हास्तरीय अधिवेशन, वारकरी मंडळींचे परिसंवाद, लोककला शिबिर, भारतातील  ग्रामीण भागातील पहिला आर्ट ऑफ लिविंग चा मेगा कोर्स चे आयोजन, महिला बचत गटाचा महामेळावा असे उपक्रम राबवले आहेत.अनेक माणसं आली परंतु ती परत गेली नाहीत. ती गिरणा गौरवची संपत्ती झाली. या संपत्तीच्या जोरावर आज सुरेश पवार माणूसपणाच्या गर्भश्रीमंतीत लोळतो आहे. आभाळा एवढे काम करूनही पाय जमिनीवर कसे ठेवावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'गिरणा गौरव प्रतिष्ठान' आणि त्याचे अध्यक्ष 'सुरेश पवार' ! आगामी काळात मु.पो.गिरणा गौरव या मासिका द्वारेसाहित्य सांस्कृतिक व सामाजिक शैक्षणिक तेचा जागर केला जाणार असून, माणुस माणसापासून दुर होत आहे. म्हणून माणंस जोडण्यासाठी लवकरच जगातील पहिली टाईम बँक ची निर्मिती गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे केली जाणार आहे. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान असेल किंवा सामान्यातून असामान्य काम करणाऱ्या कर्तुत्वाचा सन्मान असेल दोघांनाही सारखेच स्थान सुरेश पवारांनी दिले आहे. खरंतर अध्यक्ष म्हटलं की, तो फक्त देखरेख करणारा असतो, येणारी आर्थिक पुंजी सांभाळणारा असतो, मंचावरती त्याचा सर्वत्र वावर असतो परंतु या सर्व गोष्टींना सुरेश पवारांनी फाटा दिला आहे. कायम पडद्याच्या मागे राहून काम करणारा हा अवलिया एवढ्या मोठ्या कामाबद्दल मनोगत व्यक्त करण्यासाठीही दुसऱ्या कार्यकर्त्याला सांगतो आणि आपण मंचाच्या मागे लगबग करत काय कमी, काय जास्त हे बघत असतो. गिरणा गौरव प्रतिष्ठान आज रौप्यमहोत्सव साजरा करत असले तरी भविष्यात याचा शतक महोत्सव आपल्या सगळ्यांच्या साक्षीने नक्कीच साजरा होईल अशी मला नक्कीच खात्री आहे. आजवर आपण गिरणा गौरव प्रतिष्ठान आणि सुरेश पवार यांना जी साथ दिली, तशीच साथ भविष्यातही आपली असेल अशी अपेक्षा बाळगतो. भविष्यात जो कोणी 'चळवळ म्हणजे काय रे भाऊ?' असे जेव्हा विचारेल तेव्हा, त्याला गिरणा गौरव प्रतिष्ठानचे कार्य सांगा किंवा दाखवा. म्हणजे त्याच्या मनातील चळवळीबद्दलच्या सगळ्या शंका दूर होतील आणि तोही माणूस सामाजिक चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या उत्कर्षासाठी कार्य करेल. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना, जाहिरातदारांना मनःपूर्वक सलाम करतो. सुरेश पवारांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी सुयश चिंतन करतो. 

राजेंद्र उगले, नाशिक 
संपर्क- 99 22 99 42 43

टिप्पण्या

  1. अतिशय धडपडीचं कार्यकर्तेपण लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश पवार. सुंदर लेख राजाभाऊ.

    उत्तर द्याहटवा
  2. तळागाळातील लोकांच्या अंतर्मनात दडलेल्या गुणांना हेरून उच्च स्तरावर मानांकित करतांना जो माता आनंद सहन करते ती फक्त ९ महिनेच पण गिरना गौरव प्राप्त आनंदअंतापर्यंत दिमाखाने मिरवत ठेवतो आणि याचे श्रेय जाते सुरेश पवार व सर्व सहकऱ्याना हेच खरे अभिनंदनीय ठरते

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।