पोलिस व अधिकारी म्हणतात "अजून कुठे काही दिसत नाही ! "शिंदे गटाच्या गाड्या पद्धतीशीर राज्याबाहेर कशा गेल्या ? अजित पवारांनी सांगितला नेमका घटनाक्रम !

पोलिस व अधिकारी म्हणतात "अजून कुठे काही दिसत नाही !"
शिंदे गटाच्या गाड्या पद्धतीशीर राज्याबाहेर कशा गेल्या ? अजित पवारांनी सांगितला नेमका घटनाक्रम !

        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून संपूर्ण महाराष्ट्रालाच धक्का दिला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं शिवसेनेचे आमदार महाराष्ट्राबाहेर पडत होते, पण याची कुणालाच कल्पना नव्हती. शिंदे गटाच्या गाड्या राज्याबाहेर पडत असताना कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. हे सर्व कसं घडलं? याबाबत अद्याप संदिग्धता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला आता जवळपास दहा महिने उलटली आहेत.

                या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. शिंदे गटाच्या गाड्या महाराष्ट्राबाहेर कशा गेल्या ? याचा नेमका घटनाक्रम अजित पवारांनी सांगितला.
            एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत. याची कुणकुण आम्हाला लागली होती. या बाबी आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या होत्या. पण आमच्या हातात राज्य असूनही काही बाबी इतक्या व्यवस्थित घडल्या की आम्ही काहीच करू शकलो नाही. खरं तर, ठाणे जिल्ह्यात कोण अधिकारी असावेत ? हे ठरवण्याचा सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिला होता. त्यामुळे तेथील पोलीस आयुक्त, ठाण्याचे आयुक्त किंवा तेथील सहा नगरपालिकांचे आयुक्त, ग्रामीणचे एसपी वगैरे नेमण्याचा सगळा अधिकार एकनाथ शिंदेंना दिला होता.”
“त्यामुळे एकनाथ शिंदे हे २० जून रोजी जेव्हा बाहेर पडले, तेव्हा त्यांनीच नेमलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुरतला सुरक्षितपणे पोहोचवण्याचं काम केलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी (उद्धव ठाकरे) संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की, शिंदे गटाच्या गाड्या जिथे असतील, तिथून त्या गाड्या परत वळवा आणि त्यांना मातोश्रीवर आणा. पण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर उद्धव ठाकरेंनी सही केली असली तरी त्या सह्या करून घेण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलं होतं. त्यामुळे सगळे अधिकारी एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. शिंदे गटाच्या सगळ्या गाड्या पद्धतशीर बाहेर पडल्यानंतर अधिकारी म्हणाले, “अजून कुठे काही दिसत नाही”, अशाप्रकारे हे सगळं घडलं. त्यानंतर, सुरत-गुवाहाटी-गोवा हे सगळ्यांना माहीतच आहे,” असा खुलासा अजित पवारांनी केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।