न्यूज मसालाचा दि. २४ फेब्रुवारी २०२२ चा अंक ! संपादकीय____ अत्याधुनिक आरोग्यसेवेसाठी मजबूत पायाभूत सुविधा....





न्यूज मसालाचा दि. २४ फेब्रुवारी २०२२ चा अंक,

संपादकीय____
अत्याधुनिक आरोग्यसेवेसाठी
मजबूत पायाभूत सुविधा....

   काेराेनासारख्या इतरही सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म जिवाणूंपासून होणारे संभाव्य प्राणघातक आजार टाळण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनच्या वतीने कंटेनमेंट प्रयोगशाळा बनविण्यात आली आहे. जवळपास २५ कोटींच्या या मोबाईल व्हॅनचे नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीया यांनी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन ही आरोग्य सेवेतील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठीची देशातील सर्वात मोठी योजना तयार केली आहे. एकीकडे व्यापक लसीकरण सुरू असतानाच संभाव्य धोक्यांवरही मात करण्याचे काम सुरु आहे.
    या मिशनच्या वतीने बीएसएल-३ कंटेनमेंट प्रयोगशाळा बनविण्यात आली आहे. या प्रयोगशाळांमध्ये निदान आणि संशोधनाशी सुसंगत सुविधा व उपकरणे आहेत. ज्यात देशी आणि विदेशी सूक्ष्मजीव यावर संशोधन करण्यात येणार आहे. यातील कर्मचाऱ्यांना व्यापक प्रशिक्षण दिले जाणार असून या बीएसएल -३ प्रयोगशाळा मोठ्या आरोग्य सेवा आणि संशोधन संस्थांशी संलग्न असतील. या प्रयोगशाळा प्रगत व्हेंटिलेशन व कम्युनिकेशन सिस्टीमसह अनेक सुरक्षा खबरदारीने सुसज्ज असतील ज्यामुळे समाजाला धोका कमी होईल.
ही व्हॅन उच्च जोखमीच्या संसर्गजन्य रोगाच्या दरम्यान देशाच्या प्रयोगशाळेची प्रतिसाद क्षमता वाढविण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देईल. अलीकडच्या वर्षात आपल्या देशाला अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागला. पश्चिम घाट प्रदेशात एव्हीयन इंफ्ल्यूएन्झा, राजस्थान मध्ये झिका आणि केरळमध्ये निपाह विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झाला होता.
   ही बीएसएल-३ प्रयोगशाळा प्रादुर्भाव व प्राणघातक विषाणूंचा सर्वेक्षणाचा समावेश असलेल्या क्षेत्रीय कार्यासाठी आवश्यक आहे. जे भाग रेल्वे/रस्ते सेवेने चांगल्या पध्दतीने जोडले गेलेले नाहीत त्याभागात हे उपकरण वेळेवर आणि जलदगतीने ऑनसाईट निदान करेल.ही अत्याधुनिक जैव सुरक्षा प्रयोगशाळा (मोबाईल व्हॅन) उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्र राज्यात प्रथमच उपलब्ध होत आहे. भारती पवार यांच्या प्रयत्नाने देशातील दुसरी व्हॅन नाशिकमध्ये उपलब्ध होत असल्यामुळे याचा फायदा दुर्गम व आदिवासी भागातील सामान्य लोकांना होणार आहे.कोरोनाच्या संकटाने काही चांगल्या गोष्टीही घडल्या.  देशभरातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली. केवळ ९ महिन्यात व्यापक लसीकरण सुरू करणारा भारत हा एकमेव देश ठरला. अनेक छोट्या देशांना आपण लसकवच पुरवले. देशभरात विक्रमी लसीकरण झाल्याने कोरोनावर नियंत्रण आणून तिसरी लाट रोखण्यात यश मिळाले. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे ही अत्याधुनिक मोबाईल व्हॅन. सर्वसामान्य जनतेला अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे धोरण केंद सरकारने ठरवले आहे. त्याचेच प्रत्यंतर नाशिकमध्ये येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।